Saturday, June 7, 2025
आरू

अकराव्या तासाला मदत करणारा परमेश्वर!

जुलै १९८३ साली अ‍ॅमस्टरडॅम मध्ये बिली ग्रॅहम ह्यांची सुवार्तिकांकरिता आंतरराष्ट्रीय कॉन्फरंस होती. १३३ देशांमधून जवळपास ५००० हजार लोक येणार होते. भारतामधून अनेक दिग्गज असे प्रभूचे सेवक ह्या कॉन्फरंसला जात होते. चर्च ऑफ दी नॅझरीनचेही अनेक पुढारी जात होते. आरूला ह्याबाबत कळले आणि आमंत्रणही मिळाले. आरूला परदेशात जाण्याची ही पहिलीच संधी होती. आरू तेव्हां पुसद नॅझरीन मंडळीवर पाळक होता. ३ लेकरं, मोजकाच पगार म्हणून आरू उदरनिर्वाहाकरिता दुधाचा व कुक्कुट पालनाचा जोड व्यवसाय करत असे. आरूला परदेशी जाण्याचे आमंत्रण आहे व तो तसला विचार करत आहे असे कळल्यावर अनेकांनी ते कसे अशक्य आहे हे अतिशय गर्विष्ठपणे व चेष्टेने वर्तवले.

पण निराश होणे हा आरूचा स्वभावच नव्हता. आरूचा ठाम निश्चय झालेला होता. त्याने पासपोर्ट आणि व्हिसा वगैरचे काम उरकले. तिकिटासाठी त्याने जुळवाजुळव सुरू केली. अनेकांची मदत होईल ह्या विश्वासाने तो नातेवाईक व इतरांना भेटत होता परंतु शक्यतांचे व अपेक्षांचे प्रत्येक दार त्याच्या तोंडावर फडाफड बंद होत होते. आरू व शिरीन आणि कुटुंब प्रार्थना करत राहिले.

आज होईल, उद्या होईल ह्या आशेने त्यांचे प्रयत्न सुरू होते पण उत्तर कुठूनच मिळत नव्हते. आणि असे सुरू असतांना आता दुसर्‍या दिवशी प्रवासाकरिता मुंबईला निघायचा दिवस उजाडला, पण आरूच्या हाती तिकिटाचा खडकूही नव्हता. संध्याकाळपर्यंत पुन्हा प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतू हाती यश आले नाही. शेवटी ते कौटुंबिक प्रार्थना करतांना देवाला म्हणाले, “देवा तुझी इच्छा जर आहे की मी जाऊ नये तर तुझ्या इच्छेला आम्ही समर्पित होऊन ती मान्य करतो.” आणि मग सर्व झोपी गेले.

रात्री साडेबारा ते एक च्या दरम्याने दरवाजावर ठकठक ऐकू येऊ लागले. आरू आणि शिरीन उठले. रात्रिच्या ह्या प्रहरी कोण असेल? मंडळीतील कोणालातरी आपली मदत हवी असेल ह्या विचाराने आरू दाराकडे सरसावला. बाहेरून पाळक साहेब, पाळक साहेब अशा दोन-तीन मानसांच्या हाका एकमागून एक ऐकू येत होत्या. आवाज ओळखिचा होता. आरूने विचारले कोण आहे? बाहेरून आवाज आला आम्ही आहोत दीपक व प्रदीप बोरघाटे! आरूने त्वरीत द्वार उघडले व विचारले की सर्वकाही ठीक आहे का? काय झाले? ते म्हणाले काही नाही आम्हाला तुमच्याकडे महत्वाचे काम आहे. बोरघाटे बंधुंचे भाऊजी मिस्टर खान सोबत होते. त्यांना आरूने आत घेतले व तेवढ्या रात्री शिरीनबाईने त्यांचे चहापाणी केले.

आरूने विषयाला हात घालून पुन्हा विचारले की काय बाब आहे? दीपक व प्रदीपने सांगितले की भाऊजींचे बंदुकीचे लायसन्स एक्सपायर व्हायच्या आत त्यावर बंदूक चढवणे अगत्याचे आहे. आपल्याकडे ट्वेल्व बोअर बंदूक आहे ती विकणार का? आरूने म्हटले की होय, विकतो! आणि म्हणाला की तुम्हीच सांगा काय किंमत देणार? भाऊजींनी किंमत सांगितली आणि काय चमत्कार, ती किंमत म्हणजे तिकिटाला जेवढे पैसे लगाणार नेमके तेवढीच होती. लगेच पैसे घेऊन बंदूक दिली व व्यवहार पूर्णही झाला.

आरूने लगेच त्यांना साक्ष सांगितली की हे कशारितीने त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर आहे. त्यांनी कुटुंबासहीत रात्रीच्या अडीच वाजता देवाची स्तुती केली. दुसर्‍या दिवशी सकाळीच आरूने मुंबई गाठले. तिथे थॉमस कुक ह्या एजंसी मधून त्याने तिकीट काढले परंतु मग सोबत न्यायला खडकू नव्हता. रात्री उशिरा फ्लाईट होते. आरू त्याचा भाऊ विद्दू याच्या घरी अंधेरी मध्ये विमानतळावर जायला तयार झाला. तेव्हा विद्दूची पत्नी भारती म्हणाली, “भाऊजी, तिकीट तर काढले पण सोबत न्यायला काही पैसे आहेत की नाही?” विद्दू व भारतीची आर्थिक परिस्थिती दणकट होती. आरूजवळ पैसे नाहीत हे भारतीने ओळखले होते. तिने लगेच दोनशे डॉलर्स काढून आरूच्या खिशात घातले. ते परेदेशवारी करून परत पुसदपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसे झाले.

आरू नेहमी म्हणत असे, “देव त्याच्या दासांना निराश होऊ देत नाही आणि त्यांची गरज अकराव्या तासाला भागवतो!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *