आरूच्या आईची प्रार्थना!
गीताबाई म्हणजे १३ लेकरांची आई. पती कोंडूजी ह्यांनी स्वत:चे घर वाशिमला इनामदारपुर्यात बांधले. तिथेच ते वास्तव्याला होते. आरू लग्न करून पत्नी व मुलासह आई-वडिलांसोबत राहात असे. आरू तेव्हां बाकलिवाल हायस्कुल मध्ये फिजिकल एज्युकेशन टीचर म्हणून सरकारी नौकरीत कार्यरत होता व पत्नी शिरीन ही रेनॉल्ड्स मेमोरियल हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स. मुलगा राजू ११ महिण्यांचा.
आरू, गीताबाई व कोंडूजींचे ११ नंबरचे अपत्य. शहरामध्ये नगराध्यक्षांपासून ते कलेक्टर पर्यंत आरूच्या ओळखी व बैठकी असत. शारीरिक क्षमतांच्या व पराक्रमांच्या जोरावर शहरात त्याचा निराळाच धाक. त्याच्या वाटेला कोणी जात नसे. एका अमेरिकन मिशनरी बाईने तर आरू काय चिज आहे हे न समल्यामुळे, “आरू हा नरकासाठी राखलेला आहे” असे उद्गार काढले होते. आरू उगाचच कोणाला भीत नसे. मिशन हॉस्पिटलचे अधिकारी वर्ग त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्याला टाळतच असत. रेनॉल्डस हॉस्पिटलमध्ये सेवारत काही अमेरिकन शिकारी डॉक्टर लोकांशी मात्र त्याची गाढ मैत्री. हे सर्व असे असुनही आरू मात्र चर्च सेक्रेटरी असे. राजकारणात तो कोणाची डाळ शिजू देत नसे. प्रत्येक पाळक साहेबांना त्याची जबरदस्त साथ.
एकदा गीताबाई एकटीच तिच्या खोलिचे दार बंद करून मोठ्याने प्रार्थना करत होती ती आरूच्या कानावर पडली. आरू अधीक जवळ जाऊन कान लावून ती प्रार्थना ऐकू लागला. त्या प्रार्थनेने आरूचे जीवनच बदलून टाकले. गीताबाई म्हणत होती, “देवा मला सात मुलिंच्या पाठिवर पहिला मुलगा झाला तेव्हां तो मी व माझ्या पतिने तुझ्या सेवेला वाहून दिला. त्याने देशाची सेवा करण्यासाठी मिलिटरीत जाण्याचे निवडले आणि आता तो मरण पावला आहे. त्याच्या जागी मोठा मुलगा म्हणून आता आरू आहे. पण तो तर असा कठीण स्वभावाचा आहे. तो कसा काय बदलेल आणि कसा काय तुझी सेवा करू शकेल?” आरू विचार करू लागला. त्याला आठवू लागले की जीवनात अनेकदा जिवघेण्या संकंटांमधून सुटण्यासाठी आपण देवाला वचन दिले होते की तुझ्यासाठी जीवन जगेन, आणि देवाने चुटकिसरशी आपल्याला सोडवून जीवनदान दिले. आपले तारणही झालेले आहे. ह्या विचारांमध्ये असतांना त्याने प्रार्थनेत वेळ घालवला व निर्णय घेतला की शिक्षकीय कामाचा राजिनामा द्यायचा आणि सेमिनरीमध्ये प्रशिक्षण घेण्यास जायचे. आरूने निर्णय घेतला म्हणजे तो काळ्या दगडावरची रेघ.
आरूने शिरीनला ह्याबाबत तिचे म्हणणे विचारले. ती म्हणाली, “मी तुमच्याशी लग्न केले आहे, तुम्ही जाल तिकडे मी तुमच्यासोबत यायला तयार आहे.” शिरीनचा तर आनंद गगणात मावेनासा झाला होता. तिला खरे तर पाळकाशीच लग्न करायचे होते. हे तर तिच्याही प्रार्थनेचेच उत्तर!
आरूने राजिनामा दिला. हेडमास्तर फार चिडले. त्यांचा आरू फार प्रिय शिक्षक होता. त्यांनी त्याचा निर्णय बदलण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “सरकारी नोकरी सोडून देवाची सेवा करण्यास निघालास, वेडा आहेस का?” पण व्यर्थ!
आरूने मिशन चेअरमनला आपला निर्णय कळवला. पत्रव्यवहार झाला व साऊथ इंडिया बिब्लिकल सेमिनरी (SIBS), बंगारापेट, कर्नाटका मध्ये आरूला प्रवेश मिळाला. आपली पत्नी व आपला ११ महिण्यांचा मुलगा घेऊन आरू बंगारापेटला जायला निघाला. आरू खरेच जात आहे की हे त्याचे एखादे नवीन नाटक आहे हे बघण्यास १९७० साली ४०० लोक रेल्वे स्टेशनवर येऊन थडकले होते. काहिंनी अश्रुपूर्ण नेत्रांनी तर काहिंनी बरी गेली डोक्याची पिडा असे म्हणत आरू व कुटुंबाला निरोप दिला.
गीताबाईची प्रार्थना व्यर्थ गेली नाही! देवाने एका आईची प्रार्थना, तिची इच्छा वेगळ्या रितिने पूर्ण केली! प्रार्थनेत लेकरांना बदलून टाकण्याचे सामर्थ्य आहे!